Saturday, December 27, 2014

तुम्हाला काय आहे... मुलगी ? मुलगा ? की रेसचा घोडा ?

तुम्हाला काय आहे... मुलगी ? मुलगा ? 

की रेसचा घोडा ?




एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?"
तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"
दुसर्या tie वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"
तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"
तिसरा Regional manager वैतागून म्हणाला-" काही डोक आहे का तुला?"
तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात आहेत."
Executive engineer ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A , B f t डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but failed thrice "
त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-" फार मोठा गाढव आहेस तू !!"
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.
परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.
Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.

भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.

जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!


Wednesday, December 24, 2014

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

!!एक दिवसाचा पांडुरंग .....  !!


"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ
नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत
होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत
असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील,
म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '"
देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे
पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे,
मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे
उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत
उभा रहा"
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व
दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे,
माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले
पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न
करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे
पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत
उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो,
माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून
घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत,
घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर
सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल
असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे
पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते
पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व
इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न
बोलता हसत उभाच असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे
पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे,
तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात
तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट
नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट
चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक
करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू
शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ
मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार
करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून
तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून
गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस
नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे
भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व
गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार
सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे
ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण
देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत
देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू
कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस,
तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय
वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही
" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........
पांडुरंग पुढे म्हणतो .........
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये
माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे
चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता,
तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून
पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब
लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये
लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप
खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व
त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व
मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण
सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस,
आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले
खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"

तात्पर्य :-  देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच
करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर
बाळगला पाहीजे.

Sunday, December 14, 2014

'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही! - सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख

'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही!

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख: 
डॉ. अरुण नाईक, 
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या
मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी
तिने आत्महत्या केली. अजून
परीक्षाही संपली नाही.
पण मुलगी संपली.
मागे एका
मेडिकलच्या विद्यार्थ्यांने
शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले,
म्हणून आत्महत्या केली होती.
माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला
घाबरतो.
एका नामांकित
शाळेच्या स्कॉलर वर्गातील
मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की,
"सर्वजण त्यांना
काय म्हणतात?"
मुले म्हणाली,
की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली,
कारण आम्हाला
चांगले मार्क मिळतात.
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.
जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो,
तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की,
आपली किंमत कमी झाली
असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डानी
मार्क वाटायला सुरुवात
केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात
गच्च बसायला लागले आहे.
हे धोकादायक आहे....
माझी भाची शाळेतही जात
नसताना तिने काढलेल्या एका
चित्राला मी 'वा' म्हटले.
ती
लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.
शाळेत जायच्या आधीपासूनच हे
डोक्यात शिरत आहे. हे
आजूबाजूच्या वातावरणात आहे.
या विषारी वातावरणाने वरील
बळी घेतले आहेत.
जेव्हा
कधी पालकांना विचारले की,
तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की,
तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.
जरा विरोधाभास
पाहूया...
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी
बोलताना त्यांनी सांगितले की
त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला
डॉक्टर कोणाला म्हणता? तर
मुले म्हणाली की,
जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार
देऊन बरा करतो तो. सिल्वर
मेडल मिळालेल्या त्या
मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल
ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,
चांगला माणूस, चांगला डॉक्टर व चांगला व्यावसायिक आपण
जेव्हा काहीतरी चांगले करतो
तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका नववीतील
मुलीला चाचणी परीक्षेत
गणितात वीसापैकी १४ मार्क
मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा
प्रयत्न केला. माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की,
'आय एम युझलेस'.
या मुलीला
दहावीनंतर क्रीडा पत्रकार
बनायचे आहे. त्यासाठी ती
कलाशाखेला जाणार आहे.
मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू
दहावी नंतर गणिताला टाटा
करणार,मग तू गणितासाठी
जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.
ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!
मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.
आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे लक्षात न आल्यामुळे जेव्हा
मुलांना कमी मार्क मिळतात
तेव्हा आपण नकळत हिंसक होतो.
मुलांच्या आत्मविश्वासावर
घाला घालतो. मार्कावरून
मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका.
आपण जन्माला
आलो ही एकच गोष्ट आपण
जगायला लायक आहोत
यासाठी पुरेशी आहे.
आता
जगताना काय करायचे याचा विचार करूया.
'थ्री इडियट'
सिनेमातील मुलाखतीच्या
प्रसंगात आजवर मार्कावरून
आपली किंमत ठरवणारा,
घाबरणारा मुलगा म्हणतो
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक .कर ही लूंगा'..
हा आत्मविश्वास मुलांना द्या!
अवडली तर नक्की शेयर करा...!
तुमचा हा संदेश कीत्तके पालक आणी विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...

Wednesday, December 3, 2014

A nice marathi Story- जगणे (प्रा) अनलिमिटेड ! by Navin Kale

प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख !

जगणे (प्रा) अनलिमिटेड !

पोस्ट जरा मोठी आहे पण जरुर वाचा..बघा काही फरक पडतोय का आपल्या आयुष्यात...

             दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’
मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, आमीर खान, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं. मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’जगत राहायची उर्जा देत राहील !