Sunday, April 19, 2015

चाळीशी शांत - एक सुंदर लेख

चाळीशी शांत


‘…नक्की यायचं ! ’
आमंत्रण पत्रिकेची शेवटची ओळ वाचून पत्रिका बाजूला ठेवली.
‘हा माणूस काय करेल ना !’ मी हळूच पुटपुटलो.
‘काय झालं?’ सौ ने विचारलं.
मी पत्रिका दाखवली. ती वाचून सौ ने हाताच्या ऐवजी अख्खी पत्रिकाच स्वतःच्या कपाळावर मारली.
‘आग्रहाने बोलावलंय आपल्याला. जावंच लागेल.’ थोडं कंटाळतच मी म्हटलं.
‘हा कुठला मित्र तुझा ? यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं याच्याबद्दल.’ सौ ने सफाईने विषय बदलला.
तात्याबद्दल किती सांगायचं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे – हिला – काय काय सांगायचं?
मित्रांची एक मजा असते. आपल्या घरच्या मंडळींसाठी ते पाण्यावरील हिमनगासारखे असतात. पाण्याखालचे ‘नऊ दशांश’ ते फक्त आपल्यालाच माहित असतात. घरच्या मंडळींसमोर आपल्या मित्रांना ‘सेन्सॉर’ करत करत आपण कसे ‘प्रोजेक्ट’ करतो, ही तुमच्या मैत्रीची कसोटी असते. तात्याला ‘तात्या’ म्हणावं असं काही त्याचं वय नव्हतं. माझ्यापेक्षा फार फार तर दोन-तीन वर्षांनी मोठा असेल. शिक्षणावरील प्रेमापोटी तो विविध बॅचेस मधल्या मुलांचा ‘क्लासमेट’ होता. पण त्याचा एकंदरीत वावर, बोलण्याची शैली, कुठल्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याचा त्याचा प्रगाढ आत्मविश्वास पाहिला की त्याला ‘तात्या’ ही उपाधी दिलेल्या माणसाला वंदन करावेसे वाटे. स्वतःच्या आजोबांपेक्षाही ‘चार पावसाळे’ जास्त पाहिले असल्याच्या अविर्भावात तो कुणालाही कुठल्याही विषयावर सल्ले द्यायचा. अर्थशास्त्रातील ‘Inelastic demand’ ची संकल्पना शिकताना, आम्ही सिगारेटच्या किमतीचं उदाहरण घोकत असताना तात्या ‘चेन स्मोकर’ झाला होता. अतिशय बेदरकार आयुष्य जगणाऱ्या तात्याला कॉलेजमध्ये असतानाच विविध व्यसने लागली होती – नव्हे – तर त्या व्यसनांना आता तात्या लागत होता. कॉलेज वगैरे संपल्यावर अनेक धंदे करून तो ‘बिल्डर’ वगैरे झाला होता, असं कानावर पडलं होतं. त्यानंतर त्याचा काही पत्ता नव्हता…..आणि अचानक ही पत्रिका हातात पडली.
सभागृहात अनेक मंडळी. काही ओळखीचे, काही अनोळखी तर काही ओळखीचे अनोळखी ! माझी नजर तात्याला शोधत होती. तात्या कुठे दिसत नव्हता. सभागृहातील स्टेजवर एक टेबल, दोन खुर्च्या. मागील भिंतीवर एक मोठा बॅनर. त्यावर – ‘तुमच्या तात्याची चाळीशी शांत !’ हे शब्द. एक तरुण स्त्री सर्वांचं हसून स्वागत करत होती. ही तात्याची ‘ताती’ असावी असं गृहीत धरून मी आणि सौ तिच्याजवळ गेलो. नमस्कार करून माझं नाव सांगितलं. तात्याची चौकशी केली. माफक हसून ‘ते येतील इतक्यात’ असं म्हणत ‘ताती’ घोळक्यात मिसळली. तात्याच्या घरात मी ‘पाण्यावरील हिमनगाइतका’देखील माहित नव्हतो, त्याबद्दल मी तात्याचे मनोमन आभार मानले. इतर जुने मित्र भेटले. त्यांच्याशी बोलत उभा होतो आणि अचानक जल्लोष आणि टाळ्या ऐकू आल्या. आम्ही सगळ्यांनी स्टेजकडे पाहिलं. नेत्याप्रमाणे सगळ्यांना मानवंदना देत तात्या स्टेजवर आला होता.
डोक्यावर नसलेल्या केसांमुळे आता तो खरा ‘तात्या’ वाटत होता. तो एक फरक सोडला तर भूत आणि वर्तमान यात फारशी तफावत नव्हती.
‘इथे जमलेल्या माझ्या तमाम ‘निकम्म्या’ मित्रांनो आणि माझ्या ‘शुंदर शुंदर’ मैत्रिणींनो,….
‘निकम्म्या’ आणि ‘शुंदर’ जल्लोषाने सभागृह भरून गेलं ! तात्या जराही बदलला नव्हता, या स्वतःच्या समाधानालाच प्रत्येकाने सलामी दिली होती.
‘रविवारी ढांगा वर करून झोपायचे सोडून तुम्ही आत्ता या हॉलमध्ये का आहात, हे मी सांगत नाही. कारण ते सांगितलं तर तुम्हाला पाठवलेल्या आमंत्रण पत्रिकेच्या छपाईचा आणि पोस्टाचा असा सगळा खर्च फुकट जाईल. पण तरी सांगतो ! तर आज, तुमचा हा ‘तात्या’ चक्क आणि अखेरीस ‘चाळीस’ वर्षांचा झाला. ‘चक्क’ यासाठी म्हटलं कारण मी स्वतःला अजूनही ‘चाळीस’ वर्षांचा मानत नाही. आता ‘अखेरीस’ का म्हटलं ते त्याहून जास्त महत्वाचं आहे. गेल्याच वर्षी मी स्वर्गाची बेल वाजवून खाली आलोय…’
…तात्याच्या एकेका वाक्यानिशी उसळी मारणारं सभागृह आता अचानक गंभीर झालं.
‘…कम ऑन ! इतके सिरीयस होऊ नका. मागल्या वर्षी छातीत कळ येऊन गेली. तसे कॉलेजमध्ये असताना ‘छातीत कळ’ यायचे प्रसंग खूप आले. पण यावेळची कळ जरा जास्तच जीवघेणी होती. आपल्या त्या ‘इंदू’ सारखी. ती आल्ये आज? वेल, इट वॉज अ हार्ट अॅटॅक ! मी स्ट्रेचरवर असताना कांचनला म्हटलं, बहुतेक जायची वेळ आली. पण चुकून माकून वाचलोच तर माझी ‘चाळीशी शांत’ करून टाकायची ! कारण यापुढे आपली साठी शांत, पंचाहत्तरी वगैरे होईल की नाही याचा काही नेम नाही ! म्हणून हे सेलिब्रेशन ! बट लेट मी टेल यु वन थिंग. आयुष्यात खूप व्यसनं केली, पण पैसा कमवायची नशा खूप लवकर मिळाली. सकाळी उठल्यापासून ‘पेटी आणि खोके’ यांच्याच गप्पा ! या सगळ्या धावपळीत ‘हेल्थ’कडे सॉलिड दुर्लक्ष झालं. ‘आपल्याला काय होणार नाही’ या मस्तीत बॉडीला वाट्टेल तसा झिजवत राहिलो. वेळी अवेळी खाणं, शून्य व्यायाम, कामाचा स्ट्रेस, दारू, स्मोकिंग ! मी वाईट शब्द वापरतोय, माफ करा – माझ्या हेल्थवर रोज ‘रेप’ होत होता. शेवटी सहन न होऊन,एका रात्री मग बॉडीने माझ्या छातीचा दरवाजा जोरजोरात वाजवला ! आय टेल यु, आपली सॉलिड फाटली ! डायरेक्ट अॅडमिट ! मग बायपास ! डॉक्टर म्हणाले, लकी आहात म्हणून वाचलात. आता यापुढे जगायचं असेल तर मी सांगतो ते करायचं. फ्रेंड्स, मी तुमच्यातल्या अनेकांना आत्ता बघतोय. तुमच्यावरच्या प्रेमापोटी एक सांगतो. वेळीच सुधारा स्वतःला. मी जे भोगलं ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून हे सगळं सांगितलं. आजचा मेन्यू पण एकदम वेगळा आहे. सॉरी टू से, बट नो ड्रिंक्स टुडे. आय होप, यु विल स्टील एन्जॉय द पार्टी !’
टाळ्यांच्या आतषबाजीत तात्या स्टेजवरून खाली आला. माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. ‘चलता है यार’ असं काहीतरी म्हणून तात्या जोरात हसला. मी माझ्या पत्नीची ओळख करून दिली.
‘मागच्या वेळी भेटलेलास तेव्हा वेगळी होती कोणीतरी !’ तात्या आपल्या नेहमीच्या फॉर्मात येत म्हणाला.
तात्याच्या या अनपेक्षित बाउन्सरपुढे बावळटपणे हसून वेळ मारून नेणं इतकंच माझ्या हातात होतं. तात्या स्वतःच्या विनोदावर बेहद्द खूष होत हसला. स्वतःच्या विनोदाने समोरचे निष्प्रभ वगैरे झालेले बघून त्याला एक आसुरी आनंद होत असे. तात्याचा हा ‘पीळ’ अजून तसाच होता.
कार्यक्रम संपल्यावर आम्ही जायला निघणार इतक्यात एक जण म्हणाला, ‘अरे, तुझ्याजवळच हे जाधव सर राहतात. त्यांना घरी सोडशील का?’
आम्ही गाडीत बसलो. जाधव सर माझ्या शेजारी. पत्नी मागच्या बाजूस. काहीतरी विषय काढायचा म्हणून मी जाधव सरांना त्यांच्याबद्दल विचारलं.
‘मी जाधव. तात्याचा फिटनेस ट्रेनर. असे बघू नका ! माझ्या वयावर जाऊ नका. पांढऱ्या केसांवर जाऊ नका. माझं अख्खं आयुष्य लोकांना व्यायाम शिकवण्यात गेलंय. पुढल्या वर्षी पंच्याहत्तर होईन. पण तुमच्यासारखे तरुण लोक खूप येतात हल्ली. सगळ्यांची पोटं सुटलेली. व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी करून द्या सांगतात. वाट्टेल तितके पैसे द्यायला तयार असतात. मला तुमच्या पिढीची मोठी गंमत वाटते. आधी पैसे मिळवायला स्वतःची तब्येत खर्च करायची; आणि मग गेलेली तब्येत परत मिळवायला पैसे खर्च करायचे ! मी तरुणांना नेहमी दोन तीन गोष्टी सांगतो. एक म्हणजे, स्वतःसाठी व्यायाम कराच. पण त्याहूनही, तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही निरोगी आयुष्य जगलं पाहिजे. दुसरं म्हणजे, व्यायामाची ती प्रोसेस एन्जॉय करा. रिझल्ट्स आपोआप येतील. आणि तिसरं म्हणजे, तुम्ही भले पैसे कमवाल, गाडी घ्याल, बंगला घ्याल. पण ते उपभोगायला तुमची तब्येत चांगली नसेल तर काय उपयोग ?….जाधव सर उतरता उतरता मिश्कील स्वरात म्हणाले, ‘हे शरीर काही वर्षांसाठी आपल्याला भाडे तत्वावर राहायला दिलंय. मग ही ‘जागा’ सोडताना, होती तश्शी परत केली तर‘मूळ मालकाला’ ते जास्त आवडेल, नाही का?’
जाधव सरांसोबतच्या गप्पा, तात्याची ‘चाळीशी शांत’ वगैरे मनात खूप काळ रेंगाळत राहिलं. त्याचं दरम्यान एक छोटंसं पुस्तक वाचनात आलं. ‘What the most successful people do before breakfast’ असं नाव असलेल्या पुस्तकात जगातील सर्व यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयींचा एक ‘लसावि’ काढलाय. ही सगळी माणसं आपल्या व्यस्त दिनचर्येतून व्यायामासाठी ‘एक तास’ बाजूला काढतात हे लक्षात आलं. ते सगळं वाचून जेव्हा ह्या सर्व अतिव्यस्त लोकांच्या समोर स्वतःला पाहिलं तेव्हा कससंच वाटलं. लोकमान्य टिळकांनी,म्हणे, स्वतःची तब्येत कमवायला एक वर्षांचा ‘ब्रेक’ घेतला होता तेही अचानक आठवलं. माझ्यावर अवलंबून असलेले आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे चेहरे आठवले. त्यांच्यावरील प्रेम मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू का ?
एक तारीख, सोमवार वगैरे कुठलेही मुहूर्त न बघता व्यायामाला सुरुवात केलीय. खाण्याच्या सवयी बदलायला सुरुवात केलीय. ‘मिताहार’ हा एक जादुई शब्द आयुष्यात आलाय. याच दिशेने ‘धडपडणाऱ्या’ मित्र-मैत्रिणींचा एक what’s app ग्रुप बनवलाय. एकमेकांशी रिकाम्या गप्पा मारण्याऐवजी आम्ही रोज सकाळी एकमेकांना व्यायाम करायला उद्युक्त करतो, एकमेकांचे (फक्त सकारात्मक) अनुभव शेअर करतो. आता व्यायाम करताना शरीरातील एकेक स्नायू-न-स्नायू आपल्याशी संवाद साधतोय, हे लक्षात येतं. खूप चालून थकल्यावर, ‘जोर’ मारताना ताकद संपते तेव्हा जुन्या सवयींमध्ये ठाण मारून बसलेली चीज, बटर, साखर वगैरे भूते अचकट-विचकट हसतायत असा भास होतो. त्यांना न जुमानता प्रयत्न सुरु आहेत….
स्त्रियांची स्मरणशक्ती किती दांडगी असते. त्या दिवशी व्यायाम करून घरी आलो. मी आंघोळीला जाणार तितक्यात बायकोने विचारलं –
‘बाय द वे, तात्याला आधी भेटलेलास तेव्हा तुझ्याबरोबर कोण होती ?’
‘अगं, ती माझीच एखादी जुनी वाईट सवय असेल !’
बायको फक्त गोड हसली.
-
WhatsApp वर आलेला लेख. याचा लेखक अज्ञात आहे. लेखकाच्या वाचनात हि पोस्ट आल्यास कळवणे म्हणजे याचे श्रेय देता येईल.

Friday, April 3, 2015

Do You Punish Your Kids ? - तुम्ही तुमच्या मुलांना मारता किंवा शिक्षा देता का ?

 तुम्ही तुमच्या मुलांना मारता किंवा शिक्षा देता का ?


पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा, ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’ सगळे हात वर होतात. असं विचारलं की ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’ तरी सगळे हात वर! मी आणखी एक प्रश्न विचारते, ‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’ बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही. मग विचारावं की ‘ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारते. असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं? आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’ पुन्हा एकही हात वर होत नाही. पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं. रडू येतं मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’
एकदा असं झालं की पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’ मला फार नवल वाटलं. मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का? आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’ ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले,‘ ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’ आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले. आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’ पुन्हा मोठा हशा झाला. क्वचित काही पालक भेटतात न मारणारे आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’ कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’ काही असं सांगतात की ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’
मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’ पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वडय़ाचं तेल वांग्यावर म्हणतात- तसं!’
 असं आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला राग आवरत नाही तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण? एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर? तर लगेच आपण राग आवरतो.
  मग एखाद्या छोटय़ा मुलीला मी माइकपाशी बोलावते. तिला विचारते, ‘‘अगदी सोप्पा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’’ ती हो म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. मग मी तिला म्हणते, ‘‘समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’’ अर्ध मिनीट ती विचार करते आणि म्हणते, ‘‘आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.’’ सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘‘छान उत्तर दिलंस. आता दुसरा सोप्पा प्रश्न. समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’’ मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो. ती म्हणते, ‘‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’’ पालक पुन्हा जोरदार हसतात. मुलीला मी शाबासकी देते. छोटं बक्षीस देते.
आपलं असं ठरलेलंच असतं की चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठय़ा माणसांना मात्र माफ! जो आपल्याला उलट मारू शकतो त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?
   मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं, ‘‘आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.’’
‘‘आज आईनी मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.’’
‘‘आज दोघं मला खूप रागावले. मला असं वाटतंय की जगात माझं कुणीच नाही.’’
इतकं जर मुलांना वाईट वाटतं तर का मारायचं मुलांना? ‘छडी लागे छमछम’ वर अनेक पालकांचा विश्वास असतो. मारलं नाही तर मुलं बिघडतात अशी त्यांच्या मनात भीती असते. काही पालक तर हमखास असं सांगतात, ‘‘मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो!’’
    मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.’’
    पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं? कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत. सर्वाच्या तब्येती उत्तम आहेत. पशाचा काही प्रश्न नाही. घरात काही भांडण नाही अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.’’
आणि याऐवजी समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही. त्याला मार तर बसतोच वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात. हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो. अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते. आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते. आवडीच्या गोष्टी घडल्या तर पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.
तेव्हा एक लक्षात ठेवायचं, मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, ‘‘याची जरूर आहे का?’’ ९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल- ‘‘जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.’’
    तेव्हा प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. खरं तर कोण समजावून सांगत बसणार? घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात. वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे. आणि मुलं इतकी चिवट असतात की ती आपला अंत पाहतात. खरंच आहे! तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत. तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.

 मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल. रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा. त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा. आणि त्याला हे सांगा की आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, मला अमुक पाहिजे म्हणून आणि रडायला लागलास ते मला आवडलं नाही. किती खेळणी आहेत तुझ्याकडे! तरी हट्ट करायचा का? मूलपण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते. तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी. कधी नाही मिळालं तर नाही! हट्ट करू नये. तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला, तिला पटवून द्या. हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही. त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.
निसर्ग आपल्या हाती लहान मूल देतो. ते अननुभवी असतं, आकारानं छोटं असतं पण त्याचं आणि आपलं नातं कायम तसंच राहणार नसतं. एक वेळ अशी येणार असते की ते शरीरानं आपल्याहून ताकदवान असेल, मानसिकदृष्टय़ा आपण त्याच्यावर अवलंबून असू, कदाचित आíथक बाजूनंही आपल्याला त्याची मदत असेल अशा वेळी आपण त्याच्या लहानपणी जर आपली पालकत्वाची सत्ता अविचारानं वापरली असेल तर त्यानं कसं वागावं आपल्याशी?
 पालकत्वाची सत्ता ही न वापरण्यासाठी असते. ती चांगल्यासाठी जरूर वापरावी पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये. पटतंय ना? 


ता.क. :What's App वर आलेला लेख चांगला वाटला म्हणून इथे शेयर केला. लेखक सापडल्यास नाव टाकूच.