Friday, July 17, 2015

तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?


लग्नाला बारा वर्ष झाल्यावर
अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ..
."तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"
तो बावचळला ... गोंधळला ...
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ...
तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी
हा प्रश्न यायचाआणि त्याच्याकडे ही
एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ..
.पण मग लग्न झालं ..
.संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता
सोडवता ही असली तोंडी परीक्षा
पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा
गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा
ती पोळ्या करत होती ..हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .
.संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !
तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर
पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवा
जुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं
की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..
तो विचार करत होता ..काय सांगावं .. ?
मी राजा .. तू माझी राणी
वगैरे काही म्हणावं का ...नको ..
फार फिल्मी वाटतं ..तू खूप छान आहेस ..
.असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची
शक्यता आहे .
.समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ..
.राजकारण्यां सारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं
आणि तिला पटेल असं बोलणं ...
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस
असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ..
.त्याच्या मनात असले भलभलते
विचार येत होते ..सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या
उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या
विद्यार्थ्या सारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षे प्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ...आणि
पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा
घमघमाट नाकात शिरला ...
मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ...
"भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय
धुवून या ..."
तो मान डोलावून आत गेला ...आणि
पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...
बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ..
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं
तिच्याकडे पाहिलं ...
तिनं तोंडभर हसून विचारलं ..
"काही सुचलं ... ?
"त्यानं नकारार्थी मान हलवली ...
तशी ती पटकन टाळी वाजवून
आनंदानं म्हणाली ...
"मलाही नाही सुचलं ... !
"तो पुन्हा गोंधळला ...इतकी
अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं
मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ?
"सात दिवस विचार केला ..पण
मला काही सांगताच येईना ..
.मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं -
काय करावं कळेना ...
मला स्वतः विषयी शंका होती
पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम
कणभर ही आटलेलं नाही याची
खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ..
.वाटलं ..तुला उत्तर देता आलं तर
आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता
आलं नाही ...म्हणजे आपण आता
अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं'
सुरु झालंय ..
.आता शब्द सापडत नाहीत ...
आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला
सिध्द करण्याची धडपड संपलीय ...
"असं म्हणून तिनं एक कांदा भजी
त्याला भरवली ...""
त्याच्या बारा वर्षाच्या संसारा मधला
सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होत...!!!


लेखक: अनामिक
WhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचेचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

No comments:

Post a Comment