Saturday, August 16, 2014

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा...


A nice marathi story by Chandrashekhar Gokhale

कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं
ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं..
पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही..
सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा..
पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर?
तसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत जा
भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी...
भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे
नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा...
आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती..
एक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्‍याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या..कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,पेस्ट कंट्रोलची तारीख...सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकचं सामान येण्याची तारीख...,इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब
या कशातच तो सहभागी नव्हता... अगदी तिच्या महिन्याच्या तारखा... तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो.. ती एकटीचा डाव खेळत राहीली आणि आपण फक्त..तक्रार करत राहिलो..त्याला कँलेंडर समोर उभं राहणं शक्य होईना
तो बेडरूम मधे आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झूरायला आलेली तिला भिजवयला तो आतूर झाला कातर झाला.. पाणी घालायला भांड नव्हतं त्याने कूंडीच सींक मधे नेली यथेछ्च पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली.. आणि तोच तृप्त झाला..
तेव्ह्ढ्यात लँच कीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच .... तिला समोर बघून तो उनमळून गेला ... काय अवस्था करून घेतली आहे हिने... हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही? ... की आपण लक्षात घेतलं नाही?
जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?...
दोघांची नजरा नजर झाली... दोघे क्षणभरासाठी स्तब्ध
ती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते...
तो म्हणाला आत्ताच पाणी दिलय... तिचं निथळणं संपेपर्यंत थांब...
आणि ती थांबली...

Saturday, August 2, 2014

थोडा ब्रेक हवाय... Need small break... Marathi Poem

वाचण्यात आलेली एक सुंदर कविता
Need small break... Marathi Poem
थोडा ब्रेक हवाय... 



थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.

धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार.

किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.

ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसं सुख हवंय.....
घास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठंय.

आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.

future च्या plans मुळे
present वरच पडलंय पाणी...
ambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी.

home loan फेडता फेडता
Home मधेच alone झालोय.....
corporate targets पूर्ण करून emotionless zone झालोय.

before forty सर्व पार करायचय distance is so far.
थोडा break हवाय यार.

कळलंच नाही कधी पाऊस गेला
कधी थंडी आली
आणि काय काय झाले बदल.....
कळलंच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ...

गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत नाही....
तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत नाही.

कळत नाही कधी
झालो इतका परका....
smile च्या formality मुळे प्रत्येकजण,
दिसतो एक सारखा.

हा status, 
कि space सबकुच वाटतेय बेकार....

खरंच थोडा break हवाय यार...
थोडा break हवाय यार...

Poet : Unknown Yet

Tuesday, July 29, 2014

वारी- काय आहे जाणून घ्या
१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.
५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.
७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.
९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.
११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.
१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.
१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.
१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.
२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.
२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.
२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.
२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.
जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.
२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत..

Friday, July 18, 2014

आधुनिक मराठी म्हणी

आधुनिक मराठी म्हणी!

१. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा
२. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी
३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण
४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी
५. चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला
६. आपले पक्षांतर, दुसर्‍याचा फुटीरपणा
७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे
८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा
९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण
१०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो
११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना
१२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला
१३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले
१४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे
१५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता
१६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता
१७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार
१८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका
१९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला
२०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
२१. पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये
२२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही
२३. नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही
२४. घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा
२५. घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल
२६. घाईत घाई त्यात चष्मा नाही
२७. रिकामा माळी ढेकळ फोडी
२८. घरोघरी मॉडर्न पोरी
२९. ओठापेक्षा लिपस्टीक जड
३०. नाकापेक्षा चष्मा जड
३१. अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार
३२. बायकोची धाव माहेरापर्यंत
३३. गोष्ट एक चित्रपट अनेक
३४. काम कमी फाईली फार
३५. लाच घे पण जाच आवर
३६. मंत्र्याच पोर गावाला घोर
३७. मरावे परी मूर्तिरुपे उरावे
३८. नटीच्या लग्नाला सतरा नवरे
३९. मिळवत्या मुलीला मागणी फार
४०. रिकामी मुलगी शृंगार करी
४१. प्रेमात पडला हुंडयास मुकला
४२. दुरुन पाहुणे साजरे
४३. ऑफीसात प्यून शहाणा
४४. सत्ता नको पण खैरनार आवर
४५. एक ना धड भाराभर पक्ष
४६. हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे
४७. थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे
४८. तोंडाला पदर गावाला गजर
४९. कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं
५०. रात्र थोडी डास फार
५१. शिर सलामत तो रोज हजामत
५२. नेता छोठा कटआऊट मोठा
५३. चिल्लरपुरता सत्यनारायण
५४. दैव देते आयकर नेते
५५. डीग्री लहान वशिला महान


मराठी वाचकांसाठीआणखी काही अशाच पोस्ट

Sunday, July 13, 2014

आई, आयफोन आणि १८ अटी - Conditions by Mom to Son for iPhone

आई, आयफोन आणि १८ अटी
A nice letter by Mom to her son for using new iPhone

जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३
वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि
त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये
चर्चेचा विषय ठरलेली
ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट.
जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत.
तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे
भुणभुण करत होता की, मला
माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच!
शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे
काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं
खूळ नाही.
शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय
घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला
त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन!
पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली
त्याच्यासाठी आणलेल्या
नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती.
आयफोन हातात
आलेल्या मुलासाठी काही नियम होते त्या चिठ्ठीत.
जेनेल इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग लिहिते.
ग्रेगला लिहिलेली ती चिठ्ठी तिनं नंतर
आपल्या ब्लॉगवर टाकली आणि जगभरातल्या आया ते वाचून
भलत्याच खूश झाल्या.
लहान वयात टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी उतावीळ
असलेल्या हल्लीच्या मुलांना कसं
आवरावं आणि त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामांपासून त्यांना कसं
दूर ठेवावं या
चिंतेत असणार्या आयांना जेनेलनं आपल्या या ब्लॉगमधून जणू
एक नवा मार्गच
दाखवला आहे.
’माझ्या मुलाला तंत्रज्ञानाचं व्यसन लागू नये, त्यानं
त्याचा दुरुपयोग करू नये
असं मला वाटत होतं. तंत्रज्ञानाच्या आहारी न
जाता त्याचा उत्तम उपयोग कसा
करावा हे माझ्या मुलानं शिकावं असं मला वाटत होतं म्हणून
मी त्याला एकूण १८
अटी घातल्या ‘- 
जेनेल हॉफमन लिहिते.
जेनेलच्या या १८ अटी सध्या इंटरनेटवर भलत्याच चर्चेत आहेत.
त्यांचा हा अनुवाद
प्रिय ग्रेग,
१. हा आयफोन
तुझ्यासाठी आणला असला तरी त्याची मालकी माझी आहे, कारण
याचे पैसे
मी दिलेले आहेत. हा फोन तुझा नाही,
तो मी तुला वापरायला दिलेला आहे, हे लक्षात
ठेव.
२. त्या फोनला पासवर्ड टाकलास, तर
तो मला माहिती असला पाहिजे.
३. रिंग वाजली की फोन उचलायचा. तो ’फोन’ आहे. त्यावर
तुझ्याशी बोलता येणं हा
त्याचा मूळ उपयोग आहे. शिवाय फोन न उचलणं असभ्यपणाचं
आहे. त्यामुळे ‘मॉम‘किंवा
‘डॅड’ हे नाव फ्लॅश झालं की तो फोन उचलायचा..लगेच!
४. रोज संध्याकाळी ७.३0 वाजता आणि शनिवार-
रविवारी रात्री फोन माझ्याकडे
द्यायचा. मी तो फोन रात्री बंद करीन आणि सकाळी ७.३0
वाजता चालू करून परत तुला
देईन. रात्री उशिरा तुला एखाद्या मित्राला, मैत्रिणीला फोन
करायचा झाला, तर तो
त्यांच्या घरच्या फोनवर करायचा. त्यांच्या आई-वडिलांपासून
लपवण्यासारखं त्यात
काही असेल, तर असा फोन न करणंच उत्तम.
५. फोन शाळेत घेऊन जायचा नाही. ज्या कुणाशी तुला फोनवरून
चॅटिंग करावंसं वाटतं
त्यांच्याशी प्रत्यक्ष बोल. गप्पा मार. ही गोष्ट छान आयुष्य
जगण्यासाठी फार
आवश्यक आहे.
६. हा फोन पाण्यात पडला, संडासात पडला, हरवला
फुटला किंवा त्याचं काहीही
नुकसान झालं तर त्याच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटचा खर्च
करणं ही तुझी
जबाबदारी असेल. त्यासाठी तू सुट्टीत काम करू शकतोस,
वाढदिवसाच्या पार्टीचे
पैसे वाचवू शकतोस किंवा खाऊला दिलेले पैसेही त्यासाठी वापरू
शकतोस. फोनच्या
बाबतीत अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्याची तयारी ठेव.
७. या फोनचा वापर कधीच कोणाशी खोटं
बोलायला किंवा कोणाला फसवायला करू नकोस.
भांडणं झाली तर एक चांगला मित्र जसा वागेल तसा वाग
आणि नाहीतर त्या भांडणात
पडू नकोस.
८. ज्या गोष्टी तू प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला सांगू शकत
नाहीस त्या एसएमएस, मेल
किंवा फोन करून सांगू नकोस.
९. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आईवडिलांसमोर तू
जी गोष्ट बोलणार
नाहीस, ती फोन वापरून लपून मेल, एसएमएस किंवा फोन करून
सांगू नकोस.
१0. फोनवर कुठलंही साहित्य उघडायचं नाही. तुला इतर
कामासाठी, प्रोजेक्टसाठी जी
माहिती हवी असेल त्यासाठी जरूर फोनवरचं इंटरनेट वापर. पण
त्याव्यतिरिक्त तुला
काही प्रश्न असतील तर माझ्याशी किंवा डॅडशी मोकळेपणानं
बोल.
११. सार्वजनिक ठिकाणी, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये
किंवा कुठल्या माणसाशी बोलत
असताना फोन सायलेंट कर किंवा बंद कर, पण तो बाजूला ठेवून दे.
समोरचा माणूस
बोलत असताना आपण फोनशी खेळ करणं उद्धटपणाचं आहे.

शिवाय आयफोन ही बोलण्यासाठी
वापरायची एक गोष्ट आहे. तो मिरवायचा स्टेट्स सिम्बॉल नाही.
१२. तुझ्या स्वत:च्या किंवा इतर कोणाच्या खासगी भागांचे
फोटो काढून ते शेअर
करू नकोस. हसू नकोस! मला माहिती आहे की तुला सगळं समजतं.
पण तरीही तुला असा
मोह कधीतरी पडू शकतो. सायबर स्पेस खूप मोठी आहे आणि इथे
एकदा आलेली प्रत्येक
गोष्ट, वाक्य, फोटो, कॉमेंट कायम इथेच राहतं.
अशा एखाद्या गोष्टीमुळे तुझं
संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं.
१३. उगीच हजारो फोटो आणि व्हिडिओ काढत बसू नकोस.
प्रत्येक गोष्ट काही फोटो
काढून ठेवण्याइतकी महत्त्वाची नसते. त्यापेक्षा तो क्षण
मनापासून एन्जॉय कर,
ते
तुझ्या कायम लक्षात राहील.
१४. कधीतरी फोन घरी ठेवून बाहेर पड. फोन बरोबर नाही म्हणजे
काहीतरी
चुकतंय, काहीतरी
राहून जातंय असं वाटून घेऊ नकोस. फोन न नेल्यामुळे
काही गोष्टी मिस् होतील. तर
त्या होऊ देत. पण त्या वेळात तुला जे मिळेल ते त्या ’फिअर
ऑफ मिसिंग आऊट’पेक्षा
मोठं असेल.
१५. सगळे जण ऐकतात त्यापेक्षा वेगळं संगीत ऐक. शास्त्रीय
संगीत ऐक. तुम्हाला
आजवर कधीच नव्हतं एवढं संगीत नेटवर सहज उपलब्ध आहे.
त्याचा फायदा घे.
१६. मेंदूला ताण देणारे खेळ, शब्दांचे खेळ, कोडी मधून मधून खेळत
जा.
१७. डोळे कायम उघडे ठेव. खिडकीच्या बाहेर काय आहे ते बघ.
पक्ष्यांचे आवाज
येतात का ते बघ, पाऊस हातावर घेऊन बघ, पायी चक्कर
मारायला जा.
गूगलशिवाय इतर
गोष्टींमधली मजा समजून घे.
१८. मला माहितीये की तू यातले नियम मोडशील. मग मी फोन
काढून घेईन.
मग आपण
त्यावर बसून चर्चा करू.
मग तू परत प्रॉमिस करशील. मग
मी तुला फोन परत देईन.
आपण पुन्हा सुरुवात करू..
काय? चालेल नं?
आयफोनबरोबर कसं
वागायचं हे तू
पहिल्यांदा शिकतो आहेस,
तशी माझीही ही पहिलीच तर वेळ आहे.
- मला अशी आशा आहे की, या अटी तुला मान्य असतील.
यातल्या बहुतेक सगळ्य़ा अटी
जरी नुसत्या फोनच्या बाबतीतल्या वाटल्या तरी त्या एकूणच
आयुष्याबद्दल आहेत. तू
आणि तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी..
रोज बदलतायत, रोज
वाढतायत.
हे खूप एक्सायटिंग
आहे पण त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे
होता होईल तेवढय़ा गोष्टी
साध्या सरळ सोप्या ठेवायचा प्रयत्न कर.
आणि सगळ्य़ात
महत्त्वाचं म्हणजे
कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा तुझं मन आणि तुझी बुद्धी यावर
जास्त विश्वास ठेव.

तुझ्या नवीन आयफोनसाठी खूप खूप शुभेच्छा!

तुझीच,
मॉम****""