Monday, August 18, 2014

किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्याच्या राज्याने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले अन त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले. पण त्यासाठी त्याने आर्थरसमोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल अन वर्षभरासाठी मुक्त करेल. तोवर जर आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड. तर तो प्रश्न होता की स्त्रियांना नेमके काय पाहिजे?

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मी मी म्हणणाऱ्यांनी हात टेकले होते तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधणे जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला. तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राज विदुषकाचेही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. पण काही जणांनी सुचवले की राजधानीच्या शहराबाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर, ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले. चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल." सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती. तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा. आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते. पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीचा मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले व लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की "स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो". हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एका महान सत्याला उघड केले आहे. अन शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक रूपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला? त्यावर ती म्हणाली की मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी त्या विकृत चेटकिणीच्या रूपात राहीन व उरलेला अर्धा काळ या रूपात. आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल पण रात्री एकांतात काय ? अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे. तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?
तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.

कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा माझी कसलीही हरकत राहणार नाही. हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर खूप खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेल कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.








तात्पय॔:
बायकोला मनाप्रमाणे वागुद्या, नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे.
😋😅

Saturday, August 16, 2014

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा...


A nice marathi story by Chandrashekhar Gokhale

कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं
ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं..
पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही..
सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा..
पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर?
तसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत जा
भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी...
भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे
नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा...
आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती..
एक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्‍याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या..कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,पेस्ट कंट्रोलची तारीख...सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकचं सामान येण्याची तारीख...,इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब
या कशातच तो सहभागी नव्हता... अगदी तिच्या महिन्याच्या तारखा... तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो.. ती एकटीचा डाव खेळत राहीली आणि आपण फक्त..तक्रार करत राहिलो..त्याला कँलेंडर समोर उभं राहणं शक्य होईना
तो बेडरूम मधे आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झूरायला आलेली तिला भिजवयला तो आतूर झाला कातर झाला.. पाणी घालायला भांड नव्हतं त्याने कूंडीच सींक मधे नेली यथेछ्च पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली.. आणि तोच तृप्त झाला..
तेव्ह्ढ्यात लँच कीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच .... तिला समोर बघून तो उनमळून गेला ... काय अवस्था करून घेतली आहे हिने... हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही? ... की आपण लक्षात घेतलं नाही?
जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?...
दोघांची नजरा नजर झाली... दोघे क्षणभरासाठी स्तब्ध
ती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते...
तो म्हणाला आत्ताच पाणी दिलय... तिचं निथळणं संपेपर्यंत थांब...
आणि ती थांबली...

Saturday, August 2, 2014

थोडा ब्रेक हवाय... Need small break... Marathi Poem

वाचण्यात आलेली एक सुंदर कविता
Need small break... Marathi Poem
थोडा ब्रेक हवाय... 



थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.

धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार.

किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.

ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसं सुख हवंय.....
घास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठंय.

आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.

future च्या plans मुळे
present वरच पडलंय पाणी...
ambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी.

home loan फेडता फेडता
Home मधेच alone झालोय.....
corporate targets पूर्ण करून emotionless zone झालोय.

before forty सर्व पार करायचय distance is so far.
थोडा break हवाय यार.

कळलंच नाही कधी पाऊस गेला
कधी थंडी आली
आणि काय काय झाले बदल.....
कळलंच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ...

गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत नाही....
तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत नाही.

कळत नाही कधी
झालो इतका परका....
smile च्या formality मुळे प्रत्येकजण,
दिसतो एक सारखा.

हा status, 
कि space सबकुच वाटतेय बेकार....

खरंच थोडा break हवाय यार...
थोडा break हवाय यार...

Poet : Unknown Yet

Tuesday, July 29, 2014

वारी- काय आहे जाणून घ्या
१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.
५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.
७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.
८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.
९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.
११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.
या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.
१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.
१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.
१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.
१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.
१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.
१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.
१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.
१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.
२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.
२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.
२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.
२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.
२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.
जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.
२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत..

Friday, July 18, 2014

आधुनिक मराठी म्हणी

आधुनिक मराठी म्हणी!

१. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा
२. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी
३. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण
४. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी
५. चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला
६. आपले पक्षांतर, दुसर्‍याचा फुटीरपणा
७. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे
८. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा
९. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण
१०. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो
११. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना
१२. वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला
१३. वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले
१४. घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे
१५. साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता
१६. गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता
१७. स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार
१८. मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका
१९. न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला
२०. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
२१. पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये
२२. नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही
२३. नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही
२४. घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा
२५. घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल
२६. घाईत घाई त्यात चष्मा नाही
२७. रिकामा माळी ढेकळ फोडी
२८. घरोघरी मॉडर्न पोरी
२९. ओठापेक्षा लिपस्टीक जड
३०. नाकापेक्षा चष्मा जड
३१. अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार
३२. बायकोची धाव माहेरापर्यंत
३३. गोष्ट एक चित्रपट अनेक
३४. काम कमी फाईली फार
३५. लाच घे पण जाच आवर
३६. मंत्र्याच पोर गावाला घोर
३७. मरावे परी मूर्तिरुपे उरावे
३८. नटीच्या लग्नाला सतरा नवरे
३९. मिळवत्या मुलीला मागणी फार
४०. रिकामी मुलगी शृंगार करी
४१. प्रेमात पडला हुंडयास मुकला
४२. दुरुन पाहुणे साजरे
४३. ऑफीसात प्यून शहाणा
४४. सत्ता नको पण खैरनार आवर
४५. एक ना धड भाराभर पक्ष
४६. हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे
४७. थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे
४८. तोंडाला पदर गावाला गजर
४९. कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं
५०. रात्र थोडी डास फार
५१. शिर सलामत तो रोज हजामत
५२. नेता छोठा कटआऊट मोठा
५३. चिल्लरपुरता सत्यनारायण
५४. दैव देते आयकर नेते
५५. डीग्री लहान वशिला महान


मराठी वाचकांसाठीआणखी काही अशाच पोस्ट