Saturday, November 15, 2014

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.



माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||
आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||
घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||
आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥
पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥
शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥
शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता -  कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥
नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ || 
वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||
पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||
शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत, 
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||
गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||
गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे, 
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||
  
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या -  डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||
प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||
दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||
जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||
खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||
मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||
घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||
पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||  
आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, 
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||
आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||
आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||
आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..
म्हणून
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे, 
पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

Source: https://www.facebook.com/TejashreePradhanOfficialPage/posts/304351639767545


Sunday, November 9, 2014

दमलेल्या बाबाची नाही सुटलेल्या ढेरीची कहाणी

सुटलेल्या ढेरीची कहाणी


दमलेल्या बाबाची जर एक कहाणी असू शकते तर
सुटलेल्या ढेरीचीही असू शकते !!
so here it goes...
तळलेली खरपूस एक भजी राणी! चटणीच्या संगे
आणी तोंडामध्ये पाणी !!
रोजचेच आहे सारे, आज नवे काही नाही, माफी कशी मागू
आज तोंड बंद नाही!!
एकाच घासात भजी खातो मी खुषीत,
त्यावरी कटींगही मारीन बशीत!!
सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या!
सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
आटपाट नगरात खादाड मी भारी! सकाळच्या चहामध्ये
पाव आणि खारी!!
रोज सकाळीच मी स्वत:शी बोले! मिसळ हाणायाचे आज
राहूनच गेले!!
जमलेच नाही जाणे काल मला जरी! आज तरी ठुसणार
भाजी आणि पुरी!!
भैय्याच्याही गाडीवर मारून मी फेरी!
नासलेल्या पाण्यातली खाई पाणीपुरी!!
मळक्या हातांचा भैय्या आवडे मला!
सुटलेल्या पोटाचीही कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
आँफिसात दिसभर असतो बसून! फिरणारी खूर्ची झेली देहाचे
वजन!
तास तास जातो लंच ब्रेकची वाट बघून, एक एक पाकीट संपे
वेफर्स गट्टम!
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आतडी पिळवटी,
वात आत दाटे !!
वाटते की उठुनिया दोन पावले फिरावे, किती भरू
पोटामध्ये आता नको व्हावे
उगाचच चालावे नी भांडावे स्वतःशी, भरलेला मैदा येऊ पाहे
गळ्य़ाशी
उधळत, खिदळत, धावणार कधी? वजनाचे वाजले बारा,
कमी होणार कधी??
हासुनिया उगाचच ओरडेल आता, गर्रकन
फिरणारा वजनाचा काटा
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणा क्षणावर ठेवू
खादाडीचा ठसा।
सांगायाचे आहे माझ्या बटाट्या वड्या!
वाढलेल्या वजनाची कहाणी तुला!!
ला लाला ला ला ला लाला ला ला!!
(C) सारंग लेले,


हि कविता WhatApp वर आलेली आहे व त्यात सारंग लेले हे कवीचे नाव आहे. जर याचा मूळ लेखक कोणी दुसरा असेल तर कृपया संपर्क साधावा

P.L. Deshpande : मराठी साहित्याचा भाई

P.L. Deshpande : मराठी साहित्याचा भाई :पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
〰〰〰〰〰〰〰〰〰
नोव्हेंबर ८, इ.स. १९१९
जून १२,इ.स. २००० 

हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार,  दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ 'ऋग्वेदी' हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते, आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ..
गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.

⏳ जीवन
गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ सालीसुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.
मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
पु.लं.चे १२ जून, इ.स. २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

 बालपण आणि शिक्षण
पु.ल.देशपांडे यांचे वडील हे ’अडवाणी कागद कंपनी‘त दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही. अशा तत्त्वनिष्ठ आणि सज्जन घरात पु.ल. जन्मले.
पु.ल.देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत. मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली. त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल.देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.
आपल्या घरात पु.ल.देशपांडे यांना खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. शिवाय त्यांच्या घरी संगीताच्या बैठका होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी व भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. पु.ल.देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.
वडिलांच्या मृत्यूमुळे पु.ल.देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या ’माझिया माहेरा जा‘ या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातला अनमोल ठेवा आहे. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या ’इंद्रायणी काठी‘ला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल., मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.

 लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकीर्दींची सुरुवात
१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ’पैजार‘ या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान ’सत्यकथा‘मधून पुलंनी लिहिलेल्या ’जिन आणि गंगाकुमारी‘ ह्या लघुकथेने रसिक वाचकांचे लक्ष वेधून घेतले, आणि पु.ल. लेखक झाले.
फर्ग्युसनमध्ये असताना पु.ल.देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ’ललितकलाकुंज‘ व ’नाट्यनिकेतन‘ या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली, आणि पु. ल. नट झाले.
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी ’तुका म्हणे आता‘ हे नाटक आणि ’बिचारे सौभद्र‘ हे प्रहसन लिहिले, आणि पु.ल. नाटककार झाले.

 चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‌‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.
१९४७सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्‌मध्ये पुल व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपट‌अभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्‍न नट म्हणून प्रसिद्धीस आले.

नभोवाणी आणि दूरचित्रवाणी
१९३७ पासून पुलंचा नभोवाणी संबंध आलाच होता. आता१९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल.देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिर्जू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथगतीत सुरू झालेल्यानृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशा वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.

 उल्लेखनीय
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंचीदूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिलेमुलाखतकार होते.साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर र्फॉर्मिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्‍नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.

 पुस्तकें
खोगीरभरती (१९४९)
नस्ती उठाठेव (१९५२)
बटाट्याची चाळ (१९५८)
गोळाबेरीज (१९६०)
असा मी असामी (१९६४)
हसवणूक (१९६८)
खिल्ली (१९८२)
कोट्याधीश पु.ल. (१९९६)
अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)
उरलं सुरलं (१९९९)
पुरचुंडी (१९९९)
मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास(१९९४)

✈ प्रवासवर्णन
अपूर्वाई (१९६०)
पूर्वरंग (१९६३)
जावे त्यांच्या देशा (१९७४)
वंगचित्रे (१९७४)

 व्यक्तिचित्रे
गणगोत (१९६६)
गुण गाईन आवडी (१९७५)
व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६)
मैत्र (१९९९)
आपुलकी (१९९९)
स्वागत (१९९९)

 कादंबरी (अनुवाद)[संपादन]
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणिहेलन पापाश्विली)
एका कोळियाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)
कान्होजी आंग्रे

 चरित्र
गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)

 एकपात्री प्रयोग
बटाट्याची चाळ (१९६१-- )

 नाटक
तुका म्हणे आता (१९४८)
अंमलदार (नाटक) (१९५2)
भाग्यवान (१९५३)
तुझे आहे तुजपाशी (१९५७)
सुंदर मी होणार (१९५८)
तीन पैशाचा तमाशा (१९७८)
राजा ओयदिपौस (१९७९)
ती फुलराणी (१९७४)
एक झुंज वाऱ्याशी (१९९४)
वटवट (१९९९)

 एकांकिका-संग्रह
मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)
विठ्ठल तो आला आला (१९६१)
आम्ही लटिके


Tuesday, October 28, 2014

Nice Article by Nana Patekar नाना पाटेकर यांचा अप्रतिम लेख.

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"


वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने.  त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.
--
"दोन गुरु"-
By नाना पाटेकर....

हा मेसेज WhatsApp वर आलेला आहे याची विश्वासाहर्ता लेख वाचून खरी वाटली म्हणून शेयर करत आहे. जर याबाद्द्ल कुणाला काही आक्षेप असल्यास कळविणे.

Wednesday, October 22, 2014

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली



एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली !!

लेखक : अनोळखी